कथा क्रमांक १०५

अभ्यास कथा क्रमांक १०५
 प्रवास जीवनाचा

एका प्रवासी बोटीला भर समुद्रात अपघात होतो. त्यावर एक जोडप प्रवास करत असत. ते दोघेही जीवरक्षक बोटीपाशी येतात.  त्यांना दिसत की बोटीत एकच जागा शिल्लक आहे. पती, पत्नीला बुडत्या बोटीवर मागे ठेउन जीवरक्षक बोटीत उडी मारतो. पत्नी बुडत्या बोटी वर थांबते. बोट पाण्याखाली जाण्याआधी ती पतीकड़े पाहून जीवाच्या आकांताने काही तरी ओरडून सांगते.
शिक्षक गोष्ट सांगायचे थांबून विचारतात, पत्नी पतीला काय म्हणाली असेल?
बहुतेक विद्यार्थी म्हणतात, 'मला तुम्ही धोका दिलात, मी तुम्हाला ओळखलेच नाही..!'
एक मुलगा मात्र गप्पच असतो.
शिक्षक त्याला विचारतात, "अरे, तुला काय वाटते ते पण सांग!"
तो मुलगा म्हणतो, "गुरुजी, मला वाटत, त़ी म्हणाली असेल, मुलांना सांभाळा..!"
शिक्षक चकित होउन विचारतात, "तुला ही गोष्ट माहीत आहे का?"
तो नकारार्थी मान हलवतो आणि म्हणतो, "नाही गुरुजी, पण माझी आई वारली तेंव्हा शेवटच्या श्वासाला ती हेच म्हणाली होती!"
"तुझे उत्तर बरोबर आहे!"
शिक्षक हलकेच म्हणाले.
बोट बुडाली. पतीने घरी जाउन, मुलीला एकट्यानेच लहानाचे मोठे केल.
खूप वर्षानंतर, वार्धक्याने त्या पतीला जेंव्हा मरण आले तेंव्हा, त्याच्या पश्चात राहिलेले सामान आवरत असताना, त्याच्या मुलीला एक डायरी सापडते.
त्यातून असे समजते की तीच्या आईला आधीच दुर्धर आजार झालेला असतो आणि ती त्यातून वाचणार नसते. त्यामुळे पतीला स्वत: जीवंत रहाण्याव्यतिरिक्त दूसरा पर्यायच नसतो.
त्या डायरीत पतीने पुढे लिहिलेले असते, "तुझ्या शेजारीच जलसमाधी घ्यायची माझी किती इच्छा होती. पण आपल्या मुलीसाठी मला तुला त्या सागराच्या तळाशी एकटीलाच कायमसाठी सोडून याव लागल!"
ही गोष्ट आपल्याला सांगते की
तात्पर्य ः चांगल्या किंवा वाईट कृतीच्या पाठी, कधी कधी मोठी गुंतागुंत असते जी आपल्या सहज लक्षात येत नाही. त्यामुळे वरवर पाहून आपण कुणाहीबद्दल लगेच मत बनवून घेउ नये.


No comments:

Post a Comment