कविता

*फुटका आरसा अन तुटका कंगवा*
----------------------------------------------

ज्यांचं ज्यांचं वय आज
40-45 आहे,
त्यांच्या स्वभावामधे
बराच संयम आहे.

कुठून आला हा संयम,
एवढी नम्रता कशी ?
अपमान पचवण्याची
ताकद आली कशी ?

या प्रश्नांची उत्तरं
जरूर तुम्हाला मिळतील,
जर तुम्हाला बालपणीचे
त्यांचे दिवस कळतील.

दारिद्र्य आणि गरीबी
घरोघरी होती,
अंग घासायला दगड
अन दाताला राखुंडी होती.

कशाचं बॉडी लोशन
अन् कसचं Hair Gel,
हिवाळ्यात अंग उललं की
आमसुलाचं तेल.

तोंड पाहण्यासाठी नेहमी
फुटका आरसा असायचा
इतकुश्याच तुकड्यामधे
एकतर फक्त डोळा ,नाहीतर कान दिसायचा.

सगळे दात असलेला कंगवा
कधीही मिळाला नाही,
अफगाण स्नोचा भाव आम्हाला
कधीच कळला नाही.

चड्डी अन् सदऱ्याला
तांब्याची इस्त्री असायची,
न्याहारीला लोणच्यासोबत
शिळी भाकरी मिळायची.

कबड्डी , लंगडी , कोया
फ़ुकटे खेळ असायचे,
दोन्ही घुडगे फुटले तरी
पोरगे खूश दिसायचे.

कांद्याचे पोहे अन्
मुरमुऱ्याचा चिवडा,
पेढ्याचा तुकडा मिळाला की
आनंद आभाळाएवढा.

काजू , बदाम यांच्याबद्दल
फक्त ऐकून होतो,
एखादा पाहुणा आला की
अंगणात नाचत होतो.

मोठ्या माणसांसमोर जायची
हिंमतच नसायची,
वडील बैठकीत असले की
पोरं ओसरीवर दिसायची.

आजकालच्या पोरांना हे
खरं वाटणार नाही,
आई वडिलांच्या गरीबीवर
विश्वास बसणार नाही.

म्हणून म्हणतो पोरांनो
आई वडिलांशी बोला,
काही नाही मिळालं तरी
आनंदाने डोला.

नसण्यातच मजा होती
मोठं झाल्यावर कळतं,
खरं शिक्षण माणसाला
गरीबीकडूनच मिळतं.

No comments:

Post a Comment