काव्यरचना दवं

गवतात कोळियाने,
विणले सुरेख जाळे ।
सावज तयात यावे,
आशा मनात पाळे ॥

थंडीत पहाटेच्या दव,
साखळून आले ।
सावज बनून थेंबही,
 जाळ्यात कैद झाले ॥

अडकून बिंदू शतशः,
झुंबर तयार झाले ।
कोवळ्या उन्हात तेजे
 चमकून रत्न झाले ॥

ते रत्नहार सारे,
 जाळ्यास भार झाले ।
चिंतीत कोळी झाला,
सावज फरार झाले ॥

मग रत्न-पारखाया,
एक “सर्वसाक्षी” आला ।
दृश्यास जोखणारा,
एक जवाहीरा मिळाला ॥

उकलून एक एक,
पृथक पदर पदर केला ।
दवबिंदू एक एक,
जणू सुट्टा हिराच केला

जरी रत्नहार भासे,
धागा गहाळ झाला ।
त्या “ईश्वरी” कलेचा,
चित्रात कळस झाला

No comments:

Post a Comment