*पाण्याची बचत, जलसंवर्धन* हवा पाणी ही निसर्गाने मानवाला दिलेली मुक्त देणगी आहे. पाणी हे विविध रूपात मिळणारी प्रवाही संपत्ती आहे.पाणी हेच जीवन आहे. पाणी जीवनाश्यक असल्यामुळे पाण्याची टंचाईची समस्या सोडवण्यासाठी अग्रक्रम द्यावा लागतो. आपला भारत देश हा कृषिप्रधान देश आहे. शेतीसाठी भरपूर पाणी लागते.भारतात खूप मोठा भाग पाण्यासाठी पावसावर अवलंबून आहे. पावसाचे पाणी सगळीकडे सारख्या प्रमाणात मिळत नाही. पावसाळी ऋतूतही अंतर्गत चढउतार आहेतच. विविध रुपात मिळणारी पाण्याची ही प्रवाह संपत्ती या जलचक्रामुळे दैनंदिन जीवनात सजीवांना पिण्यासाठी ,वापरण्यासाठी पाणी उपलब्ध होते. तरी आपल्या या भारत देशात बऱ्याच भागात पाण्याची टंचाई भरपूर प्रमाणात आहे. बऱ्याच भागात पाण्याचे दुर्भिक्ष आपल्याला दिसते. पाण्याची गरज वाढण्याचे अनेक कारणे आहेत. भारतातील लोकसंख्या वाढ ही भरपूर प्रमाणात असल्यामुळे पाणी अधिकाधिक लागते. शेतीसाठी भरपूर पाणी लागतं.तसेच उद्योगधंद्यात कारखान्यासाठी भरपूर प्रमाणात पाणी लागते. आज पाण्याची गरज ओळखून मानवी जीवनाला पाण्याची बचत करणे फार आवश्यक आहे. पाण्याचे व्यवस्थापन करण्यासाठी नेमकी गरज ओळखून पाण्याचा दुरुपयोग उधळपट्टी कमी करावी लागेल. जसे की आवश्यक असेल तरच नळ चालू करावा. विनाकारण नळाचे पाणी वाया जाऊ देऊ नये. दात घासताना आंघोळ करताना आवश्यक तेवढेच पाण्याचा वापर करावा. पाण्याचा अपव्यय होणार नाही याची काळजी घ्यावी. अंघोळीसाठी शावर चा वापर न करता बादलीत पाणी घेऊन वापर करावा. मोरयातील सांडपाण्याचा वापर बागेतील झाडांसाठी करावा. छपरावरून पडणारे पावसाचे पाणी साठवून त्याचा वापर करावा. किंवा घराच्या छपरावरील पावसाचे पाणी टाक्यात साठवुन पाणी रिचार्ज पीट च्या साह्याने पाणीसाठ्यात भरावे. सांगायचे तात्पर्य म्हणजे एवढेच की आपल्या दैनंदिन व्यवहारात सांडपाण्यावर जे पाणी लागते त्या सांडपाण्याच्या शुद्धीकरणाची प्रक्रिया करून त्या पाण्याचा अन्य कामासाठी वापर करणे आवश्यक आहे. पाणीबचत आपल्याला कोणत्या मार्गाने मिळते हे सर्व उपाययोजना आपण करणे आवश्यक आहे. ' पाणी आडवा, पाणी जिरवा' लक्षात घेऊन आपल्याला पाणी अडवता येईल.जसे की अरुंद नाल्यावर छोटे बंधारे बांधून, पाणी अडवून हे पाणी जमिनीत जिरवता येईल. मातीचे बंधारे बांधून पाणी अडवता येईल व मातीत जिरवता येईल. पाण्याची बचत करण्यासाठी उद्योग-धंद्यात पाण्याचा काळजीपूर्वक वापर करावा. तसेच शेतीसाठी भरपूर प्रमाणात पाणी लागते यामध्ये कशी बचत करता येईल ते पाहावे व शेतीसाठी ठिबक सिंचन पद्धतीचा वापर करावा. शेतातील केर कचऱ्याचे आच्छादन करावे. म्हणजेच केरकचरा जमिनीवर पसरवावा त्यामुळे पाण्याचा वापर अधिक कार्यक्षमतेने होईल आणि पाण्याचा अपव्यय आपल्याला टाळता येईल. शेतजमिनीत पाणी साठवण्यासाठी खड्डे खोदले तर पाणी बचत करता येईल. बांधकाम करताना कोणत्या ऋतूत बांधकाम करावे हे ध्यानात ठेवून ज्यावेळी मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध होईल त्यावेळेस बांधकामाला सुरुवात करावी. उन्हाळ्यात पाणीटंचाई भीषण असते अशावेळी जर बांधकाम केले तर पाणी उपलब्ध होणे अवघड होते. अशा वेगळ्या उपाय योजना जर केले तर पाण्याचा अपव्यय टाळता येऊन पाण्याची बचत करता येते. भूगर्भातील पाण्याची पातळी वाढविण्यासाठी आपल्याला झाडे लावणे व जगविणे हे काम करणे फार आवश्यक आहे. जर आपण झाडे लावली तर पावसाचे पाणी भरपूर प्रमाणात पडेल. व हे पावसाचे वाहून जाणारे पाणी आपण विविध पद्धतींनी जमिनीत साठवून ठेवू शकतो. आभाळातून पडलेल्या पाण्याला आपण प्रयत्नपूर्वक जमिनीत जिरवले पाहिजे. आणि जलसंधारण वाढविले पाहिजे. यामुळे जमिनीखालील पाण्याची पातळी वाढेल. मग झरे ,विहिरी ,नद्या ,यांचे पाणी आटणार नाही. अशाप्रकारे पाणी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होईल आणि आपले जीवन खऱ्या अर्थाने बहरू लागेल. म्हणून आपण सर्वांनी भूगर्भातील पाण्याची पातळी वाढविण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले पाहिजे. आणि पाण्याचा अपव्यय न करता पाण्याची बचत केली पाहिजे. तरच आपल्या पुढील भविष्यकाळातील पिढी सुखी समृद्ध व आनंदाचे आयुष्य जगेल. त्यासाठी आपल्याला पाणी बचतीच्या वेगवेगळ्या उपाययोजना आता करणे फार आवश्यक आहे. एक म्हण आहे माणसाने आपल्या जीवनात *'पाणी, नाणी, आणि वाणी याचा जपून वापर करावा.'* 〰️〰️〰️〰️〰️〰️ ✍लेखिका श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (सहशिक्षिका) ता.हदगाव जि.नांदेड. 〰️〰️〰️〰️〰️〰️

No comments:

Post a Comment