( 5) *'मुलींचे शिक्षण, प्रगतीचे लक्षण.'* *स्त्रीशिक्षण - काळाची गरज* *“विद्येविना गेले, वाया गेले पशू,* *स्वस्त नका बसू ,विद्या घेणे.”* या ओळीतून सावित्रीबाईने शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. शिक्षण हे किती महत्वाचे आहे हे समजावून सांगितले. मुलींच्या शिक्षणासाठी अहोरात्र प्रयत्न करणारे महात्मा फुले दांपत्य होय. अज्ञानरूपी अंधकाराला दूर करण्यासाठी शिक्षणासारखे दुसरे शास्त्र नाही. शिक्षणाने मनुष्याला सत्य व असत्याचा व अंतिम हिताचा विचार करण्याची शक्ती प्राप्त होते. शिक्षण हे सुधारणेचे मूळ आहे. त्यातून स्वाभिमानाची जाणीव जागृती होते. त्यातल्या त्यात स्त्रियांना शिक्षण म्हणजे पुढे संपूर्ण कुटुंबाचे शिक्षण असे महात्मा ज्योतिराव यांचे मत होते. म्हणून महात्मा फुले यांनी स्त्री शिक्षणासाठी प्रयत्न केले. १ जानेवारी १८४८ या दिवशी सावित्रीबाई आणि ज्योतिबा फुले यांनी मुलींची पहिली शाळा सुरू केली. तत्कालीन ब्रिटिश भारतातील या देशातील तेही महाराष्ट्रातील व्यक्तीने काढलेली ही पहिलीच मुलींची शाळा ठरली.भारतातील ही पहिलीच मुलींची शाळा आहे. *सावित्रीबाई या भारतातील पहिल्या स्त्री शिक्षिका!* जानेवारी महिन्यात या शाळेत सहा मुली होत्या. नंतर वर्षाखेरीस शाळेतील मुलींची संख्या ४५ होती. *“मानवाचे कर्तुत्व हे ईश्वरकृत नसून ते त्याच्या दीर्घकालीन अनुभवाने , दीर्घदर्शी प्रयत्नाने आणि तीव्र बुद्धिमत्तेने केलेल्या सुधारणेचे फलित होय."* प्रयत्नवाद आणि कर्तुत्वावरची अढळ निष्ठा व्यक्त सावित्रीबाईनी केली.असे पराकोटीचे परखड विचार सावित्रीबाईंनी शिक्षणासाठी मांडले. स्त्री जीवनात विसाव्या शतकात मोठ्या प्रमाणात बदल झाले. त्याचे मुख्य कारण म्हणजे तिला सापडलेला शिक्षणाचा मार्ग. हा मार्ग महात्मा ज्योतिराव फुले, स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले, आगरकर ,कर्वे आणि इतर अनेकांच्या प्रयत्नातून स्त्रियांना विद्यालयाची कवाडे उघडी झाली. आज एकविसाव्या शतकात प्रत्येक क्षेत्रात प्रत्येक कसोटीत स्त्री अग्रेसर आहे.ते केवळ शिक्षणानेच. पुरुषांपेक्षा स्त्रिया कोणत्या क्षेत्रात मागे नाही. आज स्त्रिया सर्वच क्षेत्रात कार्यरत असलेल्या आपल्याला दिसून येते. पण काही ग्रामीण आदिवासी भागातील स्त्री अजूनही अशिक्षित आहे. शिक्षित करणे आवश्यक आहे. ती जर सुशिक्षित, सज्ञानी झाली तिचा फायदा कुटुंबास होतो. एक चांगली माता सांस्कृतिक शिक्षकापेक्षाही श्रेष्ठ असू शकते, हे स्त्री शिक्षणातून दिसते. म्हणून प्रत्येक स्त्री शिक्षित होणे महत्त्वाचे आहे. पंडित जवाहरलाल नेहरू मनत असतं, “मुलांचे शिक्षण हे केवळ एका व्यक्तीचे शिक्षण आहे, परंतु मुलींचे शिक्षण हे संपूर्ण कुटुंबाचे शिक्षण आहे”. म्हणून स्त्रियांना शिक्षण देणे आवश्यक आहे. भारतीय संस्कृतीत मुलांचे संगोपन आणि संवर्धन असे दुहेरी कार्य आजच्या मातेकडून अपेक्षित असल्यामुळे तिला सर्व सुसूत्रता राखून कार्य करावयाचे असते. यावरून स्त्रीच्या शिक्षणाची महती लक्षात येते. म्हणून स्त्रियांना त्यांच्या जीवनातील कार्याची पूर्ती करण्यासाठी शिक्षण आवश्यक असते. *'स्त्री म्हणजे सृजनशील सामर्थ्य आणि करुणाजन्य शक्ती होय'.* स्त्रीही सृजनशील ,सामर्थ्यवान, करुणा जन्य असते. *'जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती जगाचा उद्धारी '.* या जगाचा उद्धार करायचा असेल तर स्ञियांना शिक्षण देणे फार महत्त्वाचे आहे. जर राष्ट्राचा विकास घडवायचा असेल तर मुलींच्या शिक्षणाचा ध्यास घ्यायला हवा. स्त्री शिक्षण ही काळाची गरज आहे. जीवनातील अंधार दूर करण्यासाठी प्रत्येक स्त्रीने ज्ञानज्योत पेटवून आपले जीवन उजळावे, प्रज्वलित करावे. कारण स्त्री शिक्षण ही काळाची गरज आहे. शिक्षण ही काळाची गरज ओळखून स्त्रीने विद्या घ्यावी, सुशिक्षित बनावं, आपला नेभळट पणा सोडून धीट बनावं. एक आदर्श स्त्री, एक आदर्श पत्नी, आणि एक आदर्श माता म्हणून जगावं. त्यासाठी स्त्रीशिक्षण हे महत्त्वाचे आहे. तेव्हाच स्त्री ही समाज परिवर्तनाची देवता ठरेल. हे परिवर्तन आज हळूहळू बदलू पाहत आहे. आजची स्त्री अबला नाही ,तर सबला आहे. सक्षम बनली आहे.ती कर्तुत्ववान नारी झालेली आहे. आजच्या बदलत्या स्त्रीजीवनाच्या या काळानुसार स्त्री बदलू पाहत आहे. आजच्या युगातील स्त्री ही विचारी आहे. गेल्या शतकातील स्त्री आणि आजची स्त्री यात महदंतर आहे. आजच्या स्त्रीचा मार्ग विकासाकडे, प्रगतीकडे आणि वैभवाकडे जात आहे. स्त्री शिक्षणाची महती व्यक्त करताना माझ्या मते....... *"अंधारमय जीवनात ज्ञानदीप माझा उजळला, फुले सावित्रीबाई मुळे प्रकाश जीवनात झळकला.”* 〰️〰️〰️〰️〰️〰️ ©️✍श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे ता. हदगाव जि.नांदेड. 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️

No comments:

Post a Comment