श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे लेख..... सत्य, सत्यनिष्ठता सत्य म्हणजे सत्यवाणी, सत्य विचार सत्य आचार आणि सत्य उच्चार होय. सत्य आणि प्रामाणिकपणा या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. आपण नेहमी खरं बोलावं आणि प्रामाणिकपणान वागाव. आपण स्वतः प्रामाणिक आणि खरेपणाने वागलो तर या भूतलावरील एक अप्रामाणिक आणि खोटारडा माणूस कमी झाला असं म्हणावं. परंतु काहीजण स्वतःच्या स्वार्थासाठी खरे लपविण्यासाठी 'माझं तेच खरं' असं म्हणतात. पण ' खरं तेच माझं' अस म्हणणारी माणसं या जगी अल्पच आहेत. एका विचारवंताने म्हटले आहे 'कोण खरे ती गोष्ट महत्वाची नाही; परंतु खरे काय आहे ते महत्त्वाचे आहे.' 'कोण खरं बोलत कोण खोटं बोलतंय' हे महत्वाचं नाही. परंतु खरे काय हे महत्त्वाचे आहे. आपल्या जीवनाची खरी गुणसंपदा ही आपल्या खरेपणात, प्रामाणिकपणात, वास्तविकतेत दडलेली आहे. आपण आपल्या दैनंदिन जीवनात सत्याचा वापर करून आपले दैनंदिन जीवन तेजोमय, प्रसन्न, टवटवीत, हर्षउल्हासित करू इतके आपण सुखी होऊ. यशस्वी होऊ.आपण जितके सत्यवादी असू वास्तविक असू प्रामाणिक असू तितके समाजप्रिय असू. कारण समाज हा सत्याचा आदर करतो, प्रामाणिकपणाची कदर करतो. हे शाश्वत खरे आहे. म्हणून आपल्याला आपल्या गुणांची जाणीव जरी नसली तरी दोष मात्र आपले आपल्याला माहित असावेत. कारण माणसाला सत्य शिकवावे लागत नाही, मानवजातीला सत्य शिकवण्याची आवश्यकता नाही; त्याच्या खरेपणाची अनुभूती त्याला स्वतःला होत असते. म्हणून त्याने आपला स्वार्थ पणा सोडून निस्वार्थीपणे जीवन जगावं व आपला आदर्श प्रत्यक्षात कृतीद्वारा, आपल्या हातून घडणाऱ्या कर्मातून ,वाणीतुन इतरांना दाखवावा. सत्य हे आपल्या यशाचे मूळ आहे. सत्यनिष्ठेसाठी आपल्याला निर्भयतेची गरज असते आणि निर्भयतेसाठी स्वावलंबनाची गरज असते.नम्रता म्हणजे 'मी' पणाचा आत्यंतिक क्षय. निर्भयतेने प्रगती करून घेता येते व नम्रतेने बचाव होतो.आपण स्वतःस वाचवु शकतो. नम्रतेच्या कोंदनातच आपले अभय खुलून दिसते.आणि उदार वृत्ती वाढीस लागते."नम्रता म्हणजे लवचिकपणा. यामध्ये जिंकण्याची कला आहे आणि शौर्याची पराकाष्ठा आहे ". महात्मा गांधी नी म्हटलं आहे " सत्याचा शोध घेऊ इच्छिणाऱ्याने धुळीच्या कणापेक्षाही नम्र झाले पाहिजे. नम्रता ही अहिंसेची तेजस्वी मूर्ती आहे ". माणसाच्या अंगी नम्रता असेल तर तो सर्वांच्या ह्दयात राहतो. अशा नम्र व्यक्तीसच सत्य सापडते कारण अस म्हणतात 'पूर्ण नम्रता अंगी असल्याशिवाय सत्य सापडत नाही.' जीवनात खरे यश मिळवण्यासाठी सत्य आणि प्रामाणिकपणा अंगी असणे आवश्यक आहे, गरजेचे आहे. 〰️〰️〰️〰️

No comments:

Post a Comment