स्वभाव प्रत्येक माणसाचा वेगळा असा खास एक स्वभाव असतो. त्या व्यक्तीने आपल्या जीवनातील केलेल्या कार्याच्या त्याच्या स्वभावावर छाप पडतं असते. माणसाच्या स्वभावावर त्याचे यश-अपयश अवलंबून असतं. प्रत्येक माणूस आपल्या स्वभावानुसार प्रत्येक प्रसंगाचं मूल्यांकन करीत असतो. परंतु अस म्हणतात 'माणसाच्या स्वभावाला काही औषध नसते.' माणसाचा मूळ स्वभाव बदलत नाही. कुत्र्याचे शेपूट जसे वाकडेच असते तसे माणसाच्या स्वभावाचे विचित्र आहे. काही माणसं नम्र असतात तर काही माणसाच्या अंगी नम्रता नसते. काही माणसं सदाचारी वर्तन करतात तर काही भ्रष्टाचारी वर्तन करतात. काही माणसं सज्जन वाटतात तर काही दुर्जन वाटतात. काहीजण शांत, संयमी, शिस्तप्रिय, विवेकी, सद्गुणी, नियमांचे काटेकोर पालन करणारे, नीटनेटकी, वक्तशीरपणा अंगी असलेले असतात, तर काही व्यक्ती हट्टी, रागीष्ट, उतावीळ, चिडखोर अशा स्वभावाची असतात. एकूणच माणसाच्या स्वभावाचं गणित नक्की काही मांडता येत नाही. 'व्यक्ती तितक्या प्रवृत्ती' प्रत्येक व्यक्ती भिन्न भिन्न स्वभावाचे असते. प्रत्येकाचा स्वभाव एकमेकांच्या मध्ये मिसळेलच असे काही नाही. एखाद्या व्यक्तीला एखाद्या व्यक्तीचा स्वभाव आवडतो तर एखाद्या व्यक्तीस एखाद्याचा स्वभाव आवडत नाही. प्रत्येक व्यक्तीचे मते भिन्न असते. अशा भिन्न व्यक्तीचा प्रवृत्तीचा माणूस तो आपल्या विचारानुसार आपल्या मतानुसार समोरच्या व्यक्तीचा स्वभाव आपल्याशी जुळवून घ्यायचा की नाही ते तो व्यक्तिशः ठरवत असतो. खर तर माणसाच्या अंगी नम्रता हा गुण असणे आवश्यक आहे. सर्व सद्गुणांचा सुंदर पाया म्हणजे नम्रता होय. आपल्या स्वभावातील नम्रता ही आपल्या सर्व कार्यसिद्धि ची पहिली पायरी आहे. ज्या व्यक्तीचा स्वभाव नम्र असतो अशी व्यक्ती दुसऱ्याच्या हृदयात वास करते. दुसऱ्याचे मन नम्र व्यक्तीस जिंकता येते. आपले स्वतःचे जीवन आपल्याला सुखी, संपन्न ,आनंदी, निर्मळ, निर्भय, प्रफुल्लित, प्रसन्न ठेवायचे असेल तर आपल्या हृदयात आनंदाचा झरा फुलवायचा असेल तर आपला स्वभाव सुस्वभावी व नम्र असावा. तरच आपण आपला सूस्वभावाच्या बगीच्यात आनंदाने राहू, आपल्या मनात हा बगीचा फुलवू. त्यासाठी सद्गुणांची संपत्ती वाढवावी लागेल. 〰️〰️〰️〰️〰️〰️ ✍प्रमिलाताई सेनकुडे

1 comment:

  1. अत्यंत मार्मिक शब्दांत वर्णन केले आहे

    ReplyDelete