लेख (5) *वाचन* *'वाचन हे मनाचे अन्न आहे.'* माणसाला जगण्यासाठी जशी अन्नाची गरज भासते तशीच गरज आपल्या मेंदूला सुद्धा असते. आणि ती गरज वाचनाने समृद्ध होते. ज्ञान हा माणसाचा तिसरा डोळा आहे. आणि हे ज्ञान वाढविण्यासाठी म्हणजेच आपल्या ज्ञानाच्या कक्षा वृद्धिंगत होण्यासाठी वाचन हे फार महत्त्वाचे आहे. वाचनाने मनुष्य सुसंस्कारित होतो. वाचनाने माणसाच्या विचार करण्याची क्षमता प्रगल्भ होते. वाचनाने'मनुष्याची बुद्धी वृद्धिगत होते. वाचनाने विकास होतो. आपली जीवन समृद्धता, मेंदूची विचार करण्याची क्षमता वाढवायची असेल तर आपल्याला अधिकाधिक वाचन करणे आवश्यक आहे. वाचण्याची अधिकाधिक सवय लावून घेणे आवश्यक आहे. असं म्हणतात 'वाचनाचा लावा छंद ,त्यातच आहे खरा आनंद.'माणसाला खरोखर चा आनंद मिळवायचा असेल तर पुस्तक वाचणे फार आवश्यक आहे. डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिन आपण 'वाचन प्रेरणा'दिवस म्हणून साजरा करतो. सर्वांना वाचनाची प्रेरणा मिळावी म्हणून हा दिवस साजरा करतात. ज्ञानवंत ,गुणवंत व्हायचे असेल तर वाचनाचा छंद लावून घेणे आवश्यक आहे. माणसाने नेहमी श्रीमंत होण्यापेक्षा ज्ञानवंत होणे व गुणवंत होण्याचा प्रयत्न करावा. प्रत्येकाने किमान एक तास तरी वाचन करावे. आपण जे वाचन करत असतो ते वाचन आपण मन व मेंदू यांची स्थिरता कायम ठेवून वाचावे. असे वाचन केलेले कायम स्वरूपी स्मरणात राहते. नाहीतर भराभर वाचून साठत जाणारे ज्ञान हे फलहीन वृक्षाप्रमाणे असते. मानवी जीवनाचे सार ज्ञान आहे. हे ज्ञान प्राप्त करायचे असेल तर वाचन करावेच लागेल. म्हणूनच मानवाच्या जीवनात पुस्तकांना , ग्रंथांना महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहे. मानवाला आपल्या ज्ञानाचे अमृत पाजून चिरंजीवी करण्याचे हे कार्य ग्रंथच करत असतात. वाचनामुळे आपले जीवन जगण्याचे सामर्थ्य वाढते व आयुष्याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन बदलतो. वाचनामुळे आपल्या मनाची उदासीनता दूर होते. वाचनामुळे आपल्या भावभावनांना प्रतिसाद मिळतो. आणि आपल्या मनाचे उदात्तीकरण होते. मनात उद्भवणार्‍या शंकांचे निरसन वाचनामुळे होते. मनुष्य जीवन जगत असताना एकाकी राहू शकत नाही. त्याला कोणाचा तरी सहवास हवासा वाटतो. अशा एकाकी' सहवासात त्या व्यक्तीने पुस्तक वाचनाचा छंद जोपासला तर त्याच्या उर्वरित आयुष्याचा काळ चांगल्यारितीने व्यतीत होतो. पुस्तक वाचण्याच्या छंदामुळे त्याच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावतात. अधिकाधिक व्यापक गोष्टींची माहिती मिळते. मानवाच्या जीवनात वाचनास फार महत्त्वाचे स्थान प्राप्त झालेले आहे. माणसाला जीवन जगण्यासाठी अन्न वस्त्र व निवारा याची जशी गरज असते.तसेच ज्ञान वृद्धींगत होण्यासाठी वाचन संस्कृती जोपासणे फार महत्त्वाचे आहे. आपले परिपूर्ण जीवन जगायला शिकवणारी व्यक्तीमत्व विकासासाठी वाचन फार आवश्यक आहे. वाचन केल्याने ज्ञान प्राप्त होते. आणि ह्या ज्ञान प्राप्तीमुळे मनुष्य या विश्वाचा स्वर्ग बनवू शकतो. ज्यांचे वाचन अधिकाधिक त्यांचे ज्ञान अधिक. माणसाला जगण्यासाठी अन्न जितके महत्त्वाचे आहे तितकेच महत्त्व मन ,मेंदूसाठी वाचनाचे आहे . म्हणूनच म्हणते *'वाचाल तर वाचाल'.* 〰️〰️〰️〰️〰️〰️ ✍लेखिका श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे ता.हदगाव जि. नांदेड.

No comments:

Post a Comment