कविता संकलित

त्या मृगाला या मातीचा
निरोप सांगा गडे .....
त्याच्यासाठी विरह र्‍हदयी
भरले अत्तर घडे ....

स्पर्श तयाचा पहिला होता
दरवळ वार्‍यावरी .....
पुलकीत होईल रोमरोम अन्
शहारा अंगावरी
थेंबथेंब तो पिऊन घेता
मन होईल वेडे ...
त्या मृगाला या मातीचा
निरोप सांगा गडे

सृजनबीज ते बघ कधीचे
सुप्त निजले आहे
तु येण्याचा निरोप ऐकून
किती गजबजले आहे
मिलनाच्या कल्पनेनेचं
अंगी रोमांच होती खडे
त्या मृगाला या मातीचा
निरोप सांगा गडे

तू यावे वेळेवर अन्
बरसावे मनमुराद
अतृप्त जीवाची ऐक ना रे
केविलवाणी साद
कुणाकडे मी यासाठी
घालू बरे साकडे ?
त्या मृगाला या मातीचा
निरोप सांगा गडे

नैऋत्येतून म्हणे निघाला
मोसमी वार्‍यावरी
निरोप कळता हे मनही
कुठेयं थार्‍यावरी
मेघांच्या पालखीत बसूनी
ये आधी इकडे
त्या मृगाला या मातीचा
निरोप सांगा गडे

मिलनघटीका जवळ येता
धडधडे र्‍हदय बाई
विद्युल्लतेची आतापासूनी
मनात रोषणाई...
अंबराच्या अंगणी ढगांचे
वाजतील सनई चौघडे ...
त्या मृगाला या मातीचा
निरोप सांगा गडे

आतूरले रे गंध उधळण्या
हे भरले अत्तर घडे ...... !
✍ 🙏🙏

No comments:

Post a Comment