*निसर्गाशी मैत्री* *माझी वसुंधरा* 〰️〰️〰️〰️〰️〰️ *“ वाहील वारा हसेल आभाळ* *झाडा-फुलांचा करू सांभाळ* *ढग देतील पाणीच पाणी* *पक्षी गातील सुरेल गाणी "* निसर्ग हा मानवाचे प्रेरणास्थान आहे. निसर्गाचे व मानवाचे अतूट नाते आहे. निसर्ग हा मानव व इतर सजीव सृष्टी करता आणि सजीव सृष्टी निसर्ग करिता, दोघे एकमेकांशिवाय राहू शकत नाही. ' वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे' असे असे संत तुकाराम महाराजांनी म्हटले आहे. माणूस हा निसर्गाचे लेकरू ना! निसर्गाच्या रम्य वातावरणात माणूस आश्रयस्थान घेतो. निसर्गाचे मानवावर केवढे उपकार आहे. निसर्ग मानवाची भूक भागवतो तहान शमवितो, मंद मधुर वायू लहरींनी श्रमाचा परिहार करतो, सुगंधी फुलांनी त्याचे जीवन सुगंधित करतो. पण सध्या या यंत्रयुगाच्या आणि विज्ञान युगाच्या जाळ्यात माणूस इतका अडकला आहे की, निसर्गाकडे तो दुर्लक्ष करत आहे. माणूस आपल्या बुद्धीच्या जोरावर आपल्या तात्पुरत्या सुखासाठी निसर्गाचा गैरवापर करत आहे. पर्यावरणाला काळीमा फासण्याचे कार्य बुद्धिमान समजला जाणारा सृष्टीवरील मानव करत आहे. प्रदूषण निर्मिती करून आज जिकड पहावेे तिकडे प्रदूषण फोफावत चाललेले आहे. या प्रदूषणाचा पर्यावरणावर म्हणजेच निसर्गावर परिणाम होऊन या निसर्गाचा, पर्यावरणाचा तोल ढासळला जाऊ लागला आहे. पर्यायाने संतुलन बिघडलेले आहे. ही प्रदूषणाची गंभीर समस्या होऊन बसलेली आहे. तरीदेखील मानवाला आपली वनश्री आपले वैभव आहे हे त्याला समजून नाही राहिले. या सर्वाचा विपरीत परिणाम मानव प्राण्यावर होत आहे. हिरवेगार डोंगर लुटण्याचा लोभ माणसाला आवरेना, डोंगर उघडा बोडका करून माणूस आता अश्रू ढाळू लागला. पण या उघड्या डोंगराचा माथा झाकण्यासाठी, निसर्गाचा समतोल राखण्यासाठी झाडे हवीत. जमिनीची धूप थांबविण्यासाठी आणि भरपूर पाऊस पडावा यासाठी झाडांची आवश्यकता आहे. निसर्ग म्हणतो, ' अरे मित्रा मी तुझ्याच साठी जगत होतो ना! तुझ्यासाठी मरत होतो ना! निसर्ग माणसाला पावलोपावली शिकवत असतो आणि माणूस चुकला तर त्याला सजाही देतो. पण ही सजा तात्पुरती असते. माणसाला गर्व झाला की निसर्ग त्याला धडा शिकवतो. माणसाचे डोळे उघडताच पुन्हा तो आपल्या निसर्ग मिञाची सोबत घेऊन त्याचा पुन्हा जीवनसाथी बनतो. असे हे निसर्गाचे मानवाशी अतूट नाते आहे. निसर्ग हा माणसाचा महान गुरू, सखासोबती आहे. या प्रेरणेचे निसर्ग स्थान असलेल्या निसर्गाला आपण जपलेच पाहिजे. आपली सृष्टी हिरवीगार शाल पांघरून सजलेली, नटलेली असावी, दिसावी यासाठी आपण आपल्या निसर्गाला जपले पाहिजे. तेव्हा सर्वत्र झाडे न कापता ते अधिक प्रमाणात लावून जगवले पाहिजे.पाण्याची स्वच्छता राखली पाहिजे.वृक्ष वेलींवर पुञवत प्रेम केले पाहिजे.तेव्हा पर्यावरणाचा समतोल राखता येईल. 'वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे' हे उगाच नाही म्हटले संत तुकाराम महाराजांनी. 'आपली वनश्री आपण जपूया, वैभव तिचे राखूया' हाच मंत्र आपण जपला पाहिजे आणि कृतीत उतरवला पाहिजे. " लावू रोपटे होईल झाड पक्षी गातील पानाआड l येतील फळे बहरतील फुले झाडाखाली मग खेळतील मुले ताजी शुद्ध मिळेल हवा सुगंध फुलांचा घेऊन नवा. चला तर मग वसुंधरेच्या पोटी रुजवण बियांची करूया, निसर्गाशी घट्ट नाते आपले जुळवू या.... ☘☘☘☘☘☘ 👏👏👏👏👏👏👏 म्हणूनच म्हणावस वाटत 'इथे कर माझे जुळती, जिथे निसर्ग आहे माझा सोबती'.🙏🙏🙏🙏 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे. ता.हदगाव जिल्हा नांदेड.

No comments:

Post a Comment